चालू घडामोडी (16 मे 2020)
शेतमालासाठी देशव्यापी एकच बाजारपेठ :
- आत्मनिर्भर भारत योजने’अंतर्गत देशातील अल्पभूधारक आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी 11 घोषणा केल्या.
- शेती क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचे साह्य़ केले जाणार आहे.
- तर शिवाय, जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केली जाणार असून शेतीमालाच्या आंतरराज्यीय विक्रीलाही परवानगी देण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा केला जाणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
- तसेच जेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता तेव्हा हा कायदा केला गेला. आता शेतमालाला रास्त दर मिळण्यासाठी, या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
- हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतीमालाला किमान निश्चित दर देण्याची हमी मिळाली तर शेतीमालाच्या किमतीबाबत असलेली अनिश्चितता कमी होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठीही कायदा केला जाणार आहे.
- अन्नप्रक्रिया उद्योग, निर्यातदार, मोठे शेतीमाल विक्रेते यांच्याकडून शेतकऱ्यांना किमतीची हमी मिळाली तर शेतकऱ्याला उत्पन्नाची हमी मिळू शकेल.
- शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी शेतीमालाच्या आंतरराज्य विक्रीलाही परवानगी दिली जाणार असून त्यासाठी केंद्र कायदा करेल.
- शेती हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असला तरी, आंतरराज्य हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असल्याने असा कायदा करण्यात अडचण येणार नाही.
- नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यावर फक्त त्याच्या जवळच्याच कृषिबाजारात शेतीमाल विकण्याचे बंधन राहणार नाही. शिवाय, ई-विक्रीलाही प्रोत्साहन दिले जाणार असून त्यांना फक्त आडत्यांनाच माल विकावा लागणार नाही.
भारतीय तटरक्षक दलाचे जहाज संरक्षणमंत्र्यांकडून कार्यान्वित :
- भारतीय तटरक्षक दलाचे एक जहाज व दोन छेदक बोटी (इंटरसेप्टर बोटस्) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून कार्यान्वित केल्या.
- तर गोव्यातील तटरक्षक दलाचे हे जहाज व बोटी असून त्यामुळे सागरी सुरक्षा वाढणार आहे.
- भारतीय तटरक्षक दलाचे ‘सचेत’हे टेहळणी जहाज असून सी 450 व सी 451 या छेदक बोटी आहेत. त्यांचे कार्यान्वयन एका व्हीडीओ दुव्याच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांनी केले.
- तसेच सुरक्षित सागर किनारे हे देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे असून देश उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
- भारतीय तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘सचेत’हे जहाज पाच गस्ती जहाजांच्य ताफ्यातील एक असून ते गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने तयार केले आहे. त्यात दिशादर्शनाची अत्याधुनिक प्रणाली असून ते स्वदेशी बनावटीचे आहे.
- तटरक्षक दलाचे जहाज डिजिटल माध्यमातून कार्यान्वित करण्याची ही पहिलीच वेळ होती.
स्वदेशी उत्पादनांसाठी बाबा रामदेव लाँच करणार ऑनलाइन पोर्टल :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांसाठी ‘लोकसाठी व्होकल’ ही घोषणा केली होती. आजपासून प्रत्येक भारतीयाला लोकलसाठी व्होकल बनायचे आहे.
- तसेच केवळ लोकलसाठी व्होकलच बनायचे नाहीतर लोकल वस्तूंची खरेदी करायची आहे व त्यांचा अभिमान बाळगून प्रचारही करायचा आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं.
- तर त्यांच्या आवाहनाला योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदनं स्वदेशी उत्पादनांसाठी ई कॉमर्स पोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या धर्तीवरच हे पोर्टल काम करणार आहे.
- बाबा रामदेव यांच्या कंपनीनं ‘ऑर्डर मी’ या नावानं वेबपोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तर या पोर्टलवर पतंजलीशी निगडीत उत्पादनांच्या विक्री करण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्य स्वदेशी उत्पादनांचीदेखील विक्री करण्यात येईल.
- तसेच याद्वारे विक्री करण्यात येणारी उत्पादनं ऑर्डर केल्यानंतर काही तासांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसंच घरपोच सेवाही मोफत दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार :
- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही सांगितले आहे.
- “मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे. या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही करोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येवून या अदृश्य शत्रूचा पराभव करु” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
- तर माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘वर्षाच्या अखेरीस कोविड -19 वर लस उपलब्ध होईल अशी आशा आहे.’ त्यासाठी काही अधिकारी नेमण्याची त्यांनी घोषणा केली आहे.
दिनविशेष :
- 16 मे 1665 मध्ये पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
- अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे 16 मे 1866 मध्ये व्यवहारात आणले.
- क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना 16 मे 1899 मध्ये फाशी.
- 16 मे 1929 मध्ये हॉलिवूडच्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
- सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान 16 मे 1969 मध्ये शुक्रावर उतरले.
- सिक्कीम भारतात 16 मे 1975 मध्ये विलीन झाले.
- कुवेतमधे स्त्रियांना 16 मे 2005 मध्ये प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.